Friday 20 August 2021

पंचगंगेचा प्रदेश-जुन्नर

 पंचगंगेचा प्रदेश-जुन्नर 

समुद्रसपाटीपासून साधारणतः 2300 फूट उंचीवर असणारा जुन्नरचे, भौगोलिक स्थान हे खूपच रंजक असं आहे. चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला, सपाट मैदानी भाग असा हा जुन्नरचा भौगोलिक नकाशा बघता, जरासा आयताकृती दिसतो. मग जुन्नर शहरापासून पूर्वेकडचा परिसराला आपण मैदानी भाग म्हणू शकतो तिथे डोंगर आहेतच पण बऱ्यापैकी मैदानी भाग याच्यामध्ये आहे. जुन्नर शहरापासून ते पश्चिमेकडचा आणि बराचसा उत्तरेकडचा भाग हा डोंगराळ भाग आहे. जुन्नर मध्ये एकूण 187 गाव आहेत, त्यापैकी 67 गाव आदिवासी आहेत. ही सगळी आदिवासी गावं याच डोंगररांगांच्या कपारीला वसलेली आहेत. प्राचीन व्यापारी मार्ग, नाणे घाट इथल्याच कोकणकड्या मध्ये आहे.  त्याच कोकणकड्याच्या साक्षीने, अनेक देवराया आहेत, जुने दुर्मिळ वृक्ष आहेत, मोठ्या प्रमाणातील जैवविविधता या भागात आपल्याला आढळते. त्याच सोबत आभाळाशी स्पर्धा करणाऱ्या डोंगररांगा सुद्धा या भागांमध्ये आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्याच्या उपशाखा वऱ्हाडी डोंगररांगा या जुन्नरभर पसरलेल्या आहेत. मग या कोकण कड्यावरील डोंगरांमध्ये, सुरुवातीला खळाळत्या व रोरावत्या झऱ्यांच्या,  धबधब्यांच्या स्वरूपात वाहत खाली, मैदानी भागापर्यंत पोहोचत असताना, मोठ्या प्रमाणात प्रपात बनुन वाहणाऱ्या, काही जलवाहिन्या, जुन्नर मध्ये उगम पावतात. त्यांनाच आपण पंचगंगा असं म्हणतोय. जुन्नरच्या अगदी उत्तरेकडून सुरुवात केली तर, आपल्या लक्षात येईल, जुन्नर आणि अकोले तालुक्याच्या सीमेवर, डोंगरांमध्ये लपलेलं फोपसंदी गाव, त्या गावामध्ये मांडवी नदीचा उगम होतो. ही मांडवी नदी फोपसंदी, मांडवे, चिलेवाडी, ओतूर आणि पुढे ओझर जवळ येडगाव धरणामध्ये  कुकडी नदीमध्ये विसर्जित होते. मांडवी नदीचा प्रवास आहे त्याला आपण मांडवीचं खोरं म्हणू शकतो, या मांडवी खोऱ्यामध्ये, एक वेगळीच लोक संस्कृती अनुभवायला मिळते. मांडवे या गावाचा परिसर अतिशय नयनरम्य आहे, टिंग्या या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण  याच मांडवे गावात झालंय. हीच मांडवी नदी ज्यावेळेस मांडवा गावाजवळ, गावाला वळसा घालून पुढे वाहत जाते, त्या ठिकाणी दक्षिण भारताचा नकाशा तयार होतो. हा नकाशा आपल्याला कोपरे गावाच्या शिवारातून बघता येतो. कल्याण नगर महामार्गावर, उदापूर नावाचे गाव आहे, त्या गावापासून साधारण 9 किमी अंतरावर मांदारणे गाव लागतं. गावापासून पुढे गेलो की मुथाळणे गावाचा घाट लागतो. नागमोडी वळणाने डोंगर चढत चढत एका टप्प्यावर येतो, जिथे पट्टेदार वाघोबाचे मंदिर आहे, ही अशी जागा आहे इथून दोन्हीकडे ही उतार आहे. त्या ठिकाणी उभे राहून जर आपण दक्षिणेकडे बघितलं, तर जुन्नरचा विस्तीर्ण परिसर आपल्या नजरेत येतो आणि आपण उत्तरेकडे बघितलं, तर महाराष्ट्रातील 3रे उंच शिखर बरडेश्वराच्या डोंगरपर्यंतचा परिसर आपल्या नजरेच्या टप्प्यात यायला लागतो. त्या दोन डोंगरांच्यामध्ये, खोलवर खाली खळाळत वाहणारी मांडवी नदी नजरेस पडते आणि त्या नदीपर्यंत डोंगररांगा हळुवारपणे उतरत जातात, ते पायर्‍यांच्या शेतीच्या स्वरूपातून. आणि मग तिथेच कुठल्यातरी, डोंगराच्या सपाट कपारीमध्ये एकत्र ढीग लावल्यासारखी कौलारू घरं दिसू लागतात. तीच या मांडवी खोऱ्यातील तुरळक वस्ती. ज्यावेळेस मांडवी नदी पुढे जाते, त्याठिकाणी आपल्याला चिलेवाडी गावांमध्ये या मांडवी नदीला अडवलेले दिसते. मांडवी नदी म्हणजे फुरफूरणाऱ्या बैलाला वेसण घालण्यासारखे आहे. मुथाळणे गावाच्या उजवीकडच्या बाजूने, त्या टेकडीवर गेलं की आपल्याला चिलेवाडी पाचघर धरणाचा परिसर बघायला मिळतो. नजरेच्या एका टप्प्यात धरण आपल्याला दिसतं, मांडवी नदीच्या नैसर्गिक प्रवाह, या धरणापर्यंत येऊन थांबतो. चिलेवाडी पाचघर पासून मांडवी नदी ही मानवी मर्जीने समोर येते,  मग आंबेगव्हाण, रोहोकडी,ओतुर पुढे नेतवड  पर्यंत आपली ओळख टीकवत पुढे कुकडी नदी मध्ये विसर्जित होते, ती यडगाव धरणामध्ये. चिलेवाडी पाचघर पासून ते येडगाव धरणापर्यंतचा मांडवीचा प्रवास हा एका वेगळ्या जगातील प्रवास असतो. म्हणजे चिलेवाडी पाचघरच्या आधी एका सेंद्रिय पद्धतीने वाहणारी ही नदी धरणाच्या पुढे वाहत असताना एका कृत्रिम स्वरूपात येताना दिसते, अर्थात हे होत असताना आजूबाजूच्या गावांमधल्या शेती सिंचनात काम या मार्फत होत आहे. नदीच्या काठावर एक प्रकारची आदिवासी आणि कृषक समाजाची लोकसंस्कृती वसलेली आहे. मांडवीच्या खोऱ्यातून मुथाळणे डोंगररांग आहे त्या डोंगररांगेच्या पलीकडे डोकावलं की आजमितीला आपल्याला पिंपळगाव जोग्याचा जलाशय नजरेस पडतो. पिंपळगाव जोगेला जुन्नरचा समुद्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एका टप्प्यावरून पलीकडचं क्षितिजही दिसत नाही असा हा अजस्त्र जलाशय म्हणजे कृष्णावती व पुष्पावती या दोन नद्यांचा मिळून बनलेला आहे. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याच्या टोलारखिंडीच्या अलीकडच्या डोंगररांगामधुन उगम पावणारी कृष्णावती, वऱ्हाडी डोंगररांगेच्या असऱ्याने वसलेल्या बारा वाड्यांना संजीवनी बनत वहात येते. तर वेळाखिंडीच्या पलीकडून आणि दूरवरून, तळेरानच्या बाजूने, निमगिरी तळेरान या परिसरातून, वाहत येणाऱ्या पुष्पावती आणि कृष्णावतीचा संगम हा मढगावच्या परिसरामध्ये होतोव  पुढे वाहत डिंगोरे मार्गे पुन्हा यडगाव मध्ये जाऊन भेटते. आजमितीला पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यातून सुटणारे पाणी हे जुन्नरच्या पूर्व भागातील तेरा गावं आणि पारनेर तालुक्यातील पाच गावं यांचं सिंचन करत आहे. मग हे सगळं पुष्पावती कृष्णा व तिच्या खोऱ्यामध्ये आपल्याला आदिवासी त्याने कृषक समाजाचे एक वेगळी संस्कृती नावारूपाला आल्याची दिसेल.  हटकेश्वर डोंगर, गणेशखिंड, हडसर किल्ला यांना ओलांडून आपण दक्षिणेकडे जातो, तेव्हा हडसर किल्ला ते आपटाळे गाव, शंभूचा डोंगर आणि आंबोली घाटाचा उत्तर उत्तरेकडचा उतारावर पुर गावी, कुकडेश्वर डोंगरावर, कुकडी नदीचा उगम होतो. मग या कुकडी नदीच्या खोऱ्यामध्ये प्राचीन नाणेघाट आहे, जीवधन किल्ला आहे, चावंड किल्ला आहे. तर एका बाजूने हडसरचा किल्ला आहे. कुकडेश्वर परिसरामध्ये उगम पावणारी कुकडी नदी, वाहती होते नाही कुठं तर, आजच्या शहाजीसागरामध्ये अडवली जाते. कुकडीच्या खोर्‍यांचा, इतका विस्तीर्ण प्रदेश असल्यामुळे, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा संचय होतो आणि मग शहाजी सागरात अडवलेली कुकडी नदी पुढे  माणिकडोह, खामगाव आणि जुन्नर शहरापासून पुढे जात, येडगाव धरणापर्यंत येते. येडगाव धरणातून पुढे निघून पिंपळवंडी, बोरी, मंगरूळ, पुढं शिरूर मधे जाते. आंबोली घाटाचा दक्षिण-उत्तर या परिसरात, मीनेश्वर याठिकाणी, मीना नदीचे उगमस्थान आहे. या मीना नदी परिसरचा इंगळुनघाट, आंबोली घाट, दुर्गवाडी पठार याला एकत्रितपणे,।मीना नदीचे खोरे म्हणू शकतो. आणि मग या मीना नदीच्या खोऱ्यातून ही नदी पुढे वाहत वाहत वडज या ठिकाणी वडज धरणांमध्ये अडवली जाते. आणि मग तिथून पुढे सावरगाव, नारायणगाव, खोडद, मांजरवाडी या मार्गाने  जुन्नरच्या पुढे मार्गक्रमण करते. जुन्नरचा दक्षिणेकडील प्रदेश बागायती क्षेत्र होण्यामध्ये मीना नदीचा सिंहाचा वाटा आहे, जुन्नर तालुक्याचा मध्यभाग व मध्य पूर्वेकडचा प्रदेश हा बागायती क्षेत्र होण्यात कुकडी नदीचा महत्त्वाचा वाटा आहे, जुन्नरच्या पूर्वेकडचा प्रदेश सिंचित होण्यामध्ये पिंपळगाव जोगा म्हणजे पर्यायाने कृष्णावती व पुष्पावती नदीचा महत्त्वाचा वाटा आहे आणि कोपरा मांडवे परिसर आणि जुन्नरचा उत्तर भाग, ओतूर परिसर हा फलता फूलता, होण्यासाठी मांडवी नदीचा सिंहाचा वाटा आहे. एकंदरच जवळपास तेराशे स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असणार्‍या जुन्नरतालुक्याच्या, एकूण 11% वनक्षेत्र आहे, आणि उर्वरित क्षेत्रात जी काही शेती होते, जनजीवन चालते, त्याला पाणी पुरवठा करण्याचे या पाच नद्या करतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणूनच आपण त्याला पंचगंगेचा प्रदेश असं म्हणत आहोत. साधारणपणे जुन्नरमधील तीन टप्प्यात पाऊस पडतो, म्हणजे कोकणकडा परिसरांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे, जुन्नरच्या मध्य परिसरामध्ये तुलनेने कमी आहे आणि पूर्व पट्ट्यामध्ये अजूनच कमी होत जातो. मग जुन्नरच्या पश्चिमपट्ट्यात पडणारा पाऊस हा अडवला जातो,त्याचे प्रमाण साधारणपणे 28 ते 35 टीएमसीच्या आसपास आहे. आणि ह्या जुन्नरच्या डोंगरांमध्ये अडवलेलं पाणी, उर्वरित महाराष्ट्राची तहान भागवण्यासाठी उपयोगात यावं म्हणून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने, ओझर या ठिकाणी येडगाव धरण झालं, त्याच्या कालव्यातून पाणी आजमितीला सोलापूर मधील म्हाड्यापर्यंत जात आहे. जुन्नरमधील पंचगंगा या फक्त जुन्नरचीच नाही तर अहमदनगर आणि सोलापूर यांचीसुद्धा तहान भागवत आहे. जुन्नरचा हा पंचगंगेचा प्रदेश, पुणे, मुंबई, नाशिक या सुवर्ण त्रिकोणात वसलेला आहे आणि त्याच्या सांस्कृतिक आर्थिक व सामाजिक विकासात जुन्नरचा महत्त्वाचा वाटा आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल.


आळेफाटा-जुन्नर पर्यटनाचे प्रवेशद्वार

 आळेफाटा-जुन्नर पर्यटनाचे प्रवेशद्वार

पुणे-नाशिक (NH-50) आणि मुंबई-विशाखापट्टणम (NH-61) हे दोन महामार्ग जुन्नर तालुक्यातून जातात. जुन्नरमधील नद्या व कालवे जसे, इथल्या स्थानिकांच्या जीवनदायिनी आहेत, तशीच गोष्ट काहीशी या महामार्गांची आहे. या दोन महामार्गांच्या माध्यमातून, जुन्नरचा संबंध थेट पुणे, मुंबई, नाशिक आणि अहमदनगर, औरंगाबाद या मुख्य शहरांशी जोडला जातो. या दोन महामार्गांमुळे जुन्नरचे भौगोलिक स्थान, भविष्यात महत्वपूर्ण ठरत जाणार आहे. आजमितीला जुन्नरची अर्थव्यवस्था जरी शेतीआधारीत असली तरी इथलं मोकळं वातावरण आणि स्वच्छ हवामान लक्षात घेता, भविष्यात पर्यटन, प्रक्रिया व पॅकेजिंग, इतर सेवा क्षेत्र, रिअल इस्टेट क्षेत्र यांच्यासाठी चांगल्या संधी आहेत. रोजगारासाठी शहरात जायचे दिवस आता जवळपास संपले. जुन्नरसारख्या निमशहरी भागात, शहरी सुविधा सहज उपलब्ध होत असताना, इथल्या तरुण तरुणींनी, आपापल्या बौद्धिक संपदेचा उपयोग, हा रोजगार निर्मितीसाठी करायला हवा. जुन्नरमधील दोन्ही महामार्गांवर असलेली मुख्य व्यापारी केंद्रे म्हणता येतील त्यात ओतुर, आळेफाटा, नारायणगाव  यांचा समावेश होतो. त्याखालोखाल, स्थानिक व परिसरातील व्यापारी केंद्रे म्हणुन; मढ, बनकर फाटा, बेल्हे, जुन्नर यांचाही आर्थिक विस्तार व्यापक आहे. 

पर्यटनाच्या नजरेतून जुन्नरचा विचार केला तर याच महामार्गांनी पर्यटक जुन्नरला येत असतात. मुंबईहुन येणारा पर्यटक, माळशेज घाट मार्गे येतो; कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच खालुन कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, झालंच तर आंध्रप्रदेश इथला पर्यटक, पुण्याच्या बाजुने येताना, मंचर-कळंब मार्गे जुन्नरमधे दाखल होतो. मराठवाडा, विदर्भ तसेच शेजारील गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान इकडचा पर्यटक पेमगिरी-आणे गावातून जुन्नरची वेस ओलांडतो, तसेच खानदेश आणि वरती नमुद केलेल्या राज्यातून येणारे पर्यटक, आळे खिंडीतून जुन्नरमध्ये प्रवेश करतात.

आळेफाटा हा असा कॉमन पॉईंट आहे, जिथून माळशेज घाट व परिसर, आंबोली घाट व परिसर नाणे घाट व परिसर, ओझर लेण्याद्री व इतर धार्मिक पर्यटन स्थळे,  शिवनेरी सोबत इतर किल्ले आणि जुन्नरचे 300 पेक्षा जास्त  लेणी समुह अशा पर्यटन स्थळी जाण्यासाठी, पर्यटकांना आळेफाटा या ठिकाणी यावेच लागते.  आळेफाटा हे आधीच, देशभर प्रसिद्ध असलेले व्यापारी केंद्र आहे. आळेफाट्याची ओळख,  ट्रकचे बॉडी बिल्डिंग आणि पेटिंगच्या कामासाठी दूरवर आहे. आळेफाटा याठिकाणी व्यापारी असोसिएशन तसेच अनेक सामाजिक संस्थाही कार्यरत आहेत. जुन्नरचा पर्यटन विकास होत असताना, आळेफाटा या ठिकाणाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आळेफाटा व परिसरातील स्थानिकांनी, मग त्यामधे, शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय करणारे, लघु व कुटिरोद्योग करणारे, बचत गट चळवळ, तरुण तरुणी यांनी पर्यटनातील व्यावसायिक संधींचा लाभ घ्यायला हवा. अजुनही आळेफाटा व परिसरातील लोकं, पर्यटन वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करताना दिसत नाहीत.

आळेफाटा परिसरात पर्यटन विकासाला नेमक्या कोणकोणत्या संधी आहेत?

१. आळेफाटा मार्गे जुन्नरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी; पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा मग त्यात; राहण्याची सोय, जेवणाची सोय, वाहतूक व्यवस्था, गाईडची सोय यांचे नेटवर्क उभे होण्यात भरपूर स्कोप आहे. 

२. नगर, नाशिक, पुणे आणि झालंच तर अगदी मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांनी इथपर्यंत म्हणजे आळेफाट्यापर्यंत  (बस/कॅब/पीक अप ड्रॉप अशा कुठल्याही सुविधेने)यायचं, त्यापुढील, 2/3/4 दिवसांचे पर्यटन स्थळांच्या भेटीचे टुरिझम सर्किट विकसित करायचं आणि त्याचे प्रॉपर मार्केटिंग करून, पर्यटकांना आकर्षित करायचं. ज्या पर्यटकांना स्वतःचे वाहन नाही त्यांच्यासाठी या सुविधा फायदेशीर ठरतील.

3. पर्यटन करत असताना, बऱ्याचदा आपात्कालीन मदतीची गरज पडते, मग त्यात कधी गाडी खराब होते, काही अपघात होतात, काही तातडीची वैद्यकीय मदत लागते. अशावेळी महत्वाचे संपर्क क्रमांक असलेले फलक, व्यापारी असोसिएशन व इतर संस्थांनी लावले आणि गरजेनुसार योग्य मानधन घेऊन सेवा उपलब्ध करून दिली तर येणाऱ्या पर्यटकांना एक सुरक्षित फील राहील.

४. रस्त्याच्या कडेला जशी हॉटेल्स आहेत, तशीच ताजा व प्रक्रिया केलेला शेतमाल, वाळवण पदार्थ यांचे स्टॉल असले तर पर्यटक ते विकत गजेऊ शकतील.

५. जुन्नरच्या लोकांना आपण बोली भाषेत जुंदरी म्हणतो, जुंदरी बाणा हा मेहनती आहे, लढवय्या आहे आणि कल्पक आहे. हीच वृत्ती पर्यटनासारख्या संकल्पनेतून रोजगार निर्मितीसाठी  उपयोगात आणता येईल.

६.पर्यटन विकास होण्यासाठी आणि पर्यटनातून शाश्वत विकास होण्यासाठी, विविध व्यसपीठांवरून, पर्यटन वैभवाचे प्रमोशन गरजेचे आहे, तसेच वातावरण निर्मिती होणेही महत्वाचे आहे. वातावरण निर्मितीचे काम हे स्थानिक मंडळींनाच करावे लागेल. 


जबाबदार पर्यटन-जुन्नर पर्यटन

जुन्नर पर्यटन चळवळ

जुन्नर पर्यटन मॉडेल

जुन्नर पर्यटन विकास संस्था.