Sunday 17 September 2023

पराशर कृषि व संस्कृती पर्यटन – इट्स नॅचरली ऑर्गनिक/भारत समजून घ्यायचा असेल तर

 

पराशर कृषि व संस्कृती पर्यटन – इट्स नॅचरली ऑर्गनिक/भारत समजून घ्यायचा असेल तर  

 




पराशर कृषि व संस्कृती पर्यटन- मनोज आणि नम्रताचं, त्यांनी स्वतः उभारलेलं छोटसं विश्व. ज्यात आनंद आहे, अनुभूति आहे, आस्वाद आहे, अनुभव आहे, आवाका आहे, आकर्षण आहे आणि आणखी बरंच काही आहे.

 मनोज, कृषि पदवीधर, तर नम्रता फाईन आर्ट्सची डिग्री घेतलेली. मनोजला शेतीची बहुआयामी जाण; मग त्यात शेतीचा इतिहास, प्रत्यक्ष पिकं, त्यांची रंजक माहिती, पारंपरिक ते आधुनिक शेतीचा प्रवास, शेतीचे अर्थकारण, शेती- एक संस्कृती, व्यवसाय, जीवनपद्धती, शेतकरी, गाव आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अशी यादी वाढतच जाईल. मनोज त्याच्या लेखणीतून व्यक्त होतो आणि बोलताना थकत नाही. तर नम्रता तेवढीच मितभाषी पण रंगांमधून आपलं म्हणणं मांडणारी.





 उभयतांच्या मेहनतीने आणि निसर्गाच्या साथीने, उभं राहिलेल्या पराशर कृषि व संस्कृती पर्यटनाने, 2011 पासून, अनुभवसिद्ध पर्यटनाची कास धरत, आतापर्यंत फक्त महाराष्ट्रातीलच नाही, भारतातीलच नाही तर जगभरातील जवळपास 23 देशातील पाहुण्यांना;  भारताच्या कृषि व ग्रामीण संस्कृतीचा अनुभव दिलाय. ग्रामीण जनजीवन अनुभविण्याचं हे ठिकाण अनेक लोकांसाठी, आपलं हक्काचं घर बनलय. पुण्याहून 2 तास, मुंबईहून 4 तास, नाशिकहून दीड तास, आणि नगरहून 1 तासाच्या अंतरावर असलेल्या मध्यवर्ती ठिकाणावरील पराशर कृषि व संस्कृती पर्यटन अनेक कारणांसाठी लोकांच्या पसंतीस उतरतय. मग त्यात  ग्रामीण संस्कृतीचा अनुभव, शेतीच्या गोष्टी, गावातून फेरफटका, आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळांना भेटी देत असताना, आजूबाजूचा ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक, नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देतो.



        शेणाने सारवलेली जमीन, कुडाच्या भिंती, पांघरायला गोंधड्या, अगदी luxary नसली, तरी बेसिक कंफर्ट असणारी मुक्काम व्यवस्था, स्थानिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव देणारे रुचकर जेवण, स्वच्छ परिसर, मोकळी हवा आणि तितकीच प्रेमळ माणसं,  सोबतीला ग्रामीण वस्तूंचं संग्रहालय, देशी बी-बियाण्याची ओळख सांगणारी सिड बँक, 1000 पुस्तकांची लायब्ररी, नम्रताच्या वारली आर्ट, कॅलिग्राफी, कॅनव्हास पेंटिंग, स्टोन पेंटिंगने सजलेली आर्ट गॅलरी मचान, पराशर ऋषींची पर्णकुटी, छोटे छोटे शेतीचे प्रयोग असं बरंच काही. त्याच्या सोबतीने आजूबाजूच्या शेतकाऱ्यांशी गप्पा मारण्याची, त्यांच्या शेतावर, त्यांच्या सोबत काही वेळ थांबण्याची संधी , एक संध्याकाळ शेतकऱ्याच्या घरी मग त्यात गायींच्या धारा काढणं, बकरीला चारा देणं, कोंबडयाना दाणे टाकणं, शेणकोर काढणं.. अशी यादी वाढतच जाईल.



  इथं येणारे पाहुणे अनेक कारणांसाठी येत असतात. मग कोणी आपल्या फॅमिली सोबत कधी निवांत रहायला, तर कधी मुलांना शेती, माती आणि गाव दाखवायला येतो, तर कोणी आपल्या कंपनीतील मित्र मैत्रिणींसोबत जुन्नर परिसर फिरायला, ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायला येतो. कोणी कधी एकट्यानेच इथं येऊन आराम करतो; स्वतःला, स्वतःचाच वेळ देतो. इथं सोलो ट्रॅवलर तर खूप वेळा येतात, आणि त्यात मुलींचं प्रमाणही जास्त आहे.  भारताच्या अभ्यासाला आणि भारत अनुभवायला आलेल्या परदेशी अभ्यासकांसाठी पराशर हे पहिल्या पसंतीचे ठिकाण आहे. 



इथं येऊन गेलेल्या सेलिब्रिटी लोकांची यादी खूप मोठी आहे. Nawazuddin सिदिकी, पूजा बत्रा, दीप्ती भटनागर, माही गिल, निरंजन आयंगर, सिद्धार्थ जाधव, अनिकेत विश्वासराव, पूजा सावंत, उर्मिला कानेटकर, फुलवा खामकर, मिलिंद गुनाजी, संदीप कुलकर्णी, संदीप पाठक, शुभांगी लाटकर, पूजा नायक अशी कलाकार मंडळी तर राजदत्त, लक्ष्मण उतेकर, कुलदीप रूहिल अशी लेखक दिग्दर्शक मंडळी तर विना गवाणकर (एक होता कारव्हर) यांच्या सारखी लेखक मंडळी इथं राहून गेली आहेत. जेव्हा जुन्नरमध्ये काही शूटिंग सुरू असते तेव्हा कलाकारांना रहायला इथे आवर्जून यावेसे वाटते. एमएक्स प्लेयर वरील प्रसिद्ध वेबसिरीज “आश्रम” चे लेखन पराशरमध्ये थांबूनच पूर्ण करण्यात आलंय.



इथं रीडिंग हॉलिडे साठी, पेंटिंग करण्यासाठी, नृत्य, गायनाची कार्यशाळा घेण्यासाठी, आपल्या आवडीच्या लोकांसोबत गप्पा मारण्यासाठी, मोठी सुट्टी एंजॉय करण्यासाठी लोकं आवर्जून येतात. पराशरच्या प्रांगणात तर तुम्हाला खूप काही करता येतं आणि काहीच करायची गरज नसते. नुसतं एका ठिकाणी बसून जरी राहिले तरी तुमच्या नजरेसमोर निसर्गाचा बहूपात्री प्रयोग अनुभवायला मिळू शकतो. मग कधी एखादा नाचरा आपला नाच दाखवून जाईल, हळद्या थोडी झलक देईल, सूर्यपक्षी फुलातील मकरंद घेताना चमकून जाईल, दयाळ झाडाच्या शेंडयावर बसून सुर आळवेल, वाहत्या वाऱ्यासोबत डोलणाऱ्या फांद्यांना एकटक बघत राहिलं तर आपणही नकळत ती लय पकडून डोलू लागतो.  आणि यातलं काहीच नाही जाणवलं तरी तिथली हंसाची जोडी तुमचं मनोरंजन करतेच करते.



महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणुन जुन्नरचं नाव घेतलं जातं. हे होण्यात मनोजचा वाटा मोठा आहे. त्याने 2011 साली जुन्नर पर्यटन विकास संस्था सुरू केली, 2013 मध्ये जुन्नर तालुक्याचा पर्यटन नकाशा बनवला, जुन्नरमध्ये जबाबदार पर्यटन चळवळ सुरू केली. जुन्नरमध्ये किल्ले, लेण्या, प्राचीन मंदिरे, घाटवाटा, डोंगरदऱ्या, आठवडी बाजार, आध्यात्मिक अधिष्ठान, यात्रा जत्रा, बैलगाडे शर्यती, तमाशे, हटके लोकं ... असं बरंच काही आहे. हे सर्व बघायचं असेल, अनुभवायचं असेल तर मोठी सुट्टी काढून यायला पाहिजे.



एरवी जुन्नर फिरायला येऊन एखाद्या हॉटेल मध्ये राहिले तर जुन्नरचा पर्यटन वारसा जरी बघायला मिळाला तरी इथल्या स्थानिक जुंदरी संस्कृतीच्या अनुभवाला मुकाल. पण  पराशरचा मातीतला अनुभव तुमची जुन्नरची ट्रीप पूर्णत्वास घेऊन जातो. जुन्नरमधून पुणे-नाशिक आणि मुंबई-विषाखापट्टणम असे 2 राष्ट्रीय महामार्ग जातात, हे दोन्ही महामार्ग ज्या  याठिकाणी एकमेकाला छेदतात ते ठिकाण आहे आळेफाटा, आळेफाट्या पासून अवघ्या 7 किमी अंतरावर, राजुरी गावात पराशर कृषि व संस्कृती पर्यटन वसलय.



 इथल्या सगळ्या अॅक्टिविटी तर अनोख्या आहेतच पण मनोज आणि नम्रताने काही अभिनव खेळ शोधून काढले आहेत, या खेळांच्या माध्यमातून रंजकपणे शेती, अन्ननिर्मिती, फळभाज्यांची ओळख, मातीची धूप, जल साक्षरता इत्यादि मुद्दे हसत खेळत मुलांपर्यंत पोहोचवता येतात. म्हणुन तर शालेय सहलींसाठी, पराशर कृषि व संस्कृती पर्यटन हे आवर्जून जावं असं आहे. शिवाय मनोजच्या शेती शिक्षणाचा फायदा इथे येणाऱ्या शाळा कॉलेजच्या सहलींना होतो. मनोजच्या माध्यमातून शेती आणि ग्रामीण भारत यांचं नातं बहुआयामाने समजून घेता येतं. म्हणुन तर एमबीए, कॉमर्स, इकॉनॉमिक्स चे विद्यार्थी, ग्रामीण अर्थव्यवस्था, तिथले स्टेक होल्डर्स, त्यावर परिणाम करणारे घटक, उपयुक्ततेचा नियम  समजून घेण्यासाठी पराशर वर येतात. पराशरची रचना ईकोफ्रेंडली आहे, ईकोफ्रेंडली अर्कीटेक्चरचा अभ्यास करायला भारतभरातून विद्यार्थी आणि कॉलेजच्या सहली येतात. मनोज, कृषि व ग्रामीण पर्यटन संकल्पनेचा प्रशिक्षक व सल्लागार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन कमिटीवर पण तो आहे. भारतातील कृषि पर्यटन संकल्पना समजून घ्यायला, परदेशातील अभ्यासक पराशरवर आले  आहेत.   



स्वतःभवती कृत्रिम वलय तयार झालं, स्वतःला स्वतःचाच वेळ मिळेनासा झाला, जगरहाटीच्या वेगात हरवून जायला झालं,  स्वतःलाच स्वतःची ओळख पटेनासे झालंय तर मग स्वतःचा शोध घेण्यासाठी पराशर एकदम योग्य जागा आहे.   

थोडक्यात काय तर तुमच्याकडे पराशरवर येण्यासाठीची खूप सारी निमित्त आहेत, कारणं आहेत. आणि खरतर इथं येण्यासाठी काही विशिष्ट कारणच हवं असंही काही नाही. एकाच वर्षातील वेगवेगळ्या वेळी जरी तुम्ही इथं गेलात तरी तुमचा अनुभव दर वेळी वेगवेगळा असेल.            

   


      पराशर कृषि व संस्कृती पर्यटन हे व्यावसायिक असूनही आपला घरगुती बाज जपून आहे. इथं आल्यावर तुम्हाला कुठल्या हॉटेल, रिसॉर्ट किवा पर्यटन केंद्रावर आल्याचा फील येत नाही, तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी आल्यासारखे हक्काने वावरू शकता. मुंबई पुण्यात राहणारी महाराष्ट्रा बाहेरची लोकं, इथं आल्यावर, त्यांच्या मातीतला खाद्यपदार्थ इथं बनवू शकतात आणि त्यांच्या मातीची आठवण या मातीत राहून फील करू शकतात.



      तुमच्या इथल्या मुक्कामात मनोज आणि नम्रताशी होणाऱ्या तासभर गप्पा जर रंगल्या तर अजून दुग्धशर्करा योग. अशा गप्पांमधून मैत्री झालेल्या पाहुण्यांची शिदोरी हीच आमची  शाश्वत कमाई आहे हे सांगताना ते दोघंही कुठलाही बडेजाव न आणता तुमच्या सेवेशी तत्पर असतात. इथला सर्वात लहान पर्यटक 2 महिन्यांचा होता आणि सर्वात वयस्कर 85 वर्षांचा होता.

वर्षभर वेगवेगळ्या सीजनमध्ये काही न काही कृषि महोत्सव इथे होत असतात. तसेच पराशरच्या सहयोगाने वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवसिद्ध पर्यटनाचे उपक्रम वर्षभर घेण्यात येतात.    मग त्यात द्राक्ष महोत्सव, रानभाजी महोत्सव, काजवा महोत्सव, तमाशा महोत्सव, यात्रा जत्रा महोत्सव, एक दिवस आठवडी बाजारात, एक दिवस धनगरराजासोबत, भात लावणी, खळे महोत्सव अशी यादी वाढतच जाईल.   

गांधीजी म्हणायचे, भारत समजून घ्यायचा असेल तर खेड्याकडे चला. पराशरच्या माध्यमातून, भारत समजून घेण्याची संधी आपल्याला उपलब्ध आहे. कारण पराशर नॅचरली ऑर्गनिक आहे.

पराशर विषयी डिटेल व्हिडीओ

https://youtu.be/bETP0DsR7XY?si=6Vb5PyVz2aI0me0r इथं पहायला मिळेल.

 

Thursday 7 September 2023

पूर्णत्वाची ओढ

 

पूर्णत्वाची ओढ



एक बीज मातीत रुजतं...त्याला रुजण्यासाठीचं स्टोअर फूड बिजात असतं...त्याच्या मदतीने त्याला नाजुकशी पानं आणि मुळं फुटतात...मग ती मुळं जमिनीतून आवश्यक अन्नघटक घेतात... त्यासाठी त्यांना मातीतील सूक्ष्मजीव मदत करतात... मुळांनी घेतलेले अन्नघटक खोडातून आणि फांद्यामधून पानांपर्यंत पोहोचवले जातात...पानं, सूर्यप्रकाशाच्या उर्जेवर; अन्नघटक आणि कार्बन डायओक्साइडच्या मदतीने अन्न तयार करतात आणि पुन्हा फांद्याच्या मदतीने अंगभर पुरवतात... वाढ सुरू रहाते... 



     त्याचं रोपटं होतं...ते अजून वाढतं...मोठं होतं...छोट्या छोट्या फांद्या फुटतात...त्यावर पानांची संख्या वाढते...झुडप बनतं...वरुन जरी झुडुप दिसत असलं तरी आतमध्ये केमिकल लोचा सुरू असतो...  झुडुप वयात येतं... त्याला कळ्या निघतात...कळ्यांची फुलं होतात...हवेच्या, मधमाशांच्या, किड्यांच्या मदतीने  फुलांचं परागीभवन होतं...यशस्वी मिलनानंतर, अंकुर वाढू लागतो... नव्याने अंकुरलेल्या कवळ्या बिजाचा ग्रुप, एका सरळ  रेषेत कव्हरच्या आत अरेंज होतो, त्याला आपण शेंग म्हणतो... निसर्गाच्या साथीने आणि समतोलाने, पानं आणि मुळं; आपापलं काम चोखपणे बजावत असतात...



 झुडुपातील प्रत्येक पार्ट; मूळ, खोड, फांद्या, पान, फूल, शेंग असे सगळेच, बीज मोठं करण्याच्या कामात स्वतःला झोकून देतात...या प्रत्येक पार्टची ठरवून दिलेली जबाबदारी असते...ती जबाबदारी प्रत्येक जण चोखपणे पार पाडतो.. लहान कवळी बीजं, दाण्यात रूपांतरित होतात... दाणे वाढत जातात... दाणे वयात येतात... दाण्यांना मोठं करण्याच्या कामात, पूर्ण झुडुपच दमून गेलेलं असतं...मग पानं पिवळी पडतात...मुळं जीर्ण होतात... फांद्या सुकू लागतात...आता शेवटच्या घटका मोजताना, ते झुडुप मातीचं देणं विसरत नाही... 



निसर्गाच्या साथीची जाण ठेवत...स्वतःची पानं मातीत मिसळायला देतं...त्यातून मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतं...मुळांवर बॅक्टीरियाची वसाहत वाढायला जागा देतं... ते बॅक्टीरिया मातीतील अन्नघटक झाडांना मिळायला सहज सोपे करतात... यातून मातीची सुपीकता वाढते... ज्याचा उपयोग बिजाची पुढची पिढी वाढायला होतो...अशी सगळी देवाण घेवाण झाल्यावर, जीर्ण झुडुप आणि पूर्ण वाढलेल्या आणि सुकलेल्या शेंगा, ज्यात बीज हे ते काढणीला तयार असतं...यातीलच काही बीज पुनः रुजण्यासाठी तयार असतं, तर सरप्लस उत्पादन निसर्गातील इतर घटकांना, त्यात माणूसही आला, अन्न म्हणुन उपयोगात येतं.



ही झाली कुठल्याही झाडाची किवा झुडुपाची पिढ्यानपिढ्या वाढण्याची प्रकिया. पण जेव्हा निसर्गाचा समतोल ढासळतो, खूप पाऊस असेल तर जास्तीच्या ओलाव्याने  मातीतल्या बिजाचा जीव गुदमरतो, बिजातील अन्नघटक आणि जीव कुजून जातो, पूर्णत्वाचा प्रवास कायमचा अपूर्ण रहातो. याउलट जेव्हा   पाऊस ओढ देतो, हवेतील अद्रता सुकत जाते, तेव्हा मात्र ही प्रकिया पूर्ण करण्यात बिजाला खूप सारी आव्हानं तयार होतात. बिजाचा प्रत्येक पावलावरचा लढा सुरू होतो. कमी पावसाचा परिणाम सगळ्या निसर्गावरच होतो. मग बीज खायला किडे येतात, त्यांच्यापासून स्वतःला वाचवत, रुजवत वाढवायचं असतं. जमिनीत अद्रता नसल्याने अन्नघटक उपलब्ध होत नाहीत, हवेत अद्रता नसल्याने पानांना अन्ननिर्मिती प्रकिया जड जाते. जमिनीत नाही, हवेत नाही, त्यामुळे झुडुपातही पाण्याची कमतरता होते.



 त्यामुळे मुळं घट्ट पकड घेत नाहीत. जोरदार हवेत झुडुप कोलमडू शकतं. यातूनही कसंबसं कणाकणाने वाढत असताना, झुडुप, एक एक पान मोठ्या कष्टाने जमवत जातं. अंगात असेल नसेल ती सगळी ताकद पणाला लावून दोन घास अन्न तयार करतं. त्याला कळून चुकलेलं असतं की आता यापेक्षा जास्त पानं तयार करता येणार नाहीत किवा यापेक्षा जास्त आपण वाढू शकत नाही. अशा परिस्थितीत झुडुप वाट बघत बसत नाही, कारण त्याच्याकडे फार कमी ऊर्जा आणि दिवस शिल्लक असतात. कशासाठी? पूर्णत्वास जाण्यासाठी. मग अपुरी वाढ (vegetative growth) झाली असली पूर्णत्वाकडे जाण्याचा पुढचा टप्पा म्हणुन, झुडुप कळ्या (reproductive growth) तयार करते. फुलं बनतात, शेंगा निघतात, त्यात दाणे भरू लागतात. दाण्यांना मोठं व्हायला, झुडुप असेल नसेल ती  सगळी शक्ति पणाला लावते. वातावरणातील परिस्थिति बदलली, ओलावा मिळाला तर पुढचं सुरळीत होतं. आणि तसं काही नाहीच झालं तर कळ्या/फुलं/कवळ्या शेंगा/.... असा पूर्णत्वाचा प्रवास, एखाद्या टप्प्यावर अपूर्णच राहून जातो.


      

परिस्थिति कितीही प्रतिकूल असली तरी बीज, आपली पूर्णत्वाच्या प्रवासाची ओढ आणि त्यासाठीचे प्रयत्न करणं सोडत नाही. एखाद्या वर्षी सर्व काही आलबेल असलं की बिजाच्या पूर्णत्वाच्या प्रवासातील एक आवर्तन पूर्ण होते. एखाद्या वर्षी नाहीच जमलं तर प्रवास अधुरा रहातो.



बीज वैश्विक आहे, त्याचा प्रवासही तसाच वैश्विक कक्षेवरचा आहे. बीज आणि आत्मा एकाच ऊर्जेचे आणि चैतन्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे झुडप आणि शरीर यांचे संस्कारही सारखेच आहेत..ते आहेतच. आपण मात्र त्याला वेगवेगळे समजून, प्रकृतीच्या विपरीत नियम लावतो.

मनोज हाडवळे

पराशर कृषि व संस्कृती पर्यटन

7038890500  

Monday 14 August 2023

आराधनाची नृत्याराधना

 

आराधनाची नृत्याराधना



आराधना... तिच्या नावातच पूजा आहे, समर्पित भाव आहे. तिच्याविषयी लिहिण्यासारखं बरंच काही आहे. आणि ते सुद्धा फक्त यासाठी नाही की ती आतापर्यंत 3 वेळा पराशर वर येऊन गेलीय, किवा तिने माझं बंद असलेलं Instagram सुरू करून दिलंय किवा तिला छान डान्स येतो किवा तिचं व्यक्तिमत्व आकर्षक आहे... तिच्या विषयी लिहावं वाटलं कारण ती एक प्रेरणादायी ऊर्जा आहे.

आराधना व माझी ओळख फक्त वर्षभरा पूर्वीची आहे. 2022 च्या ऑगस्ट महिन्यात आराधना, तिचा नवरा विश्वजित आणि तिचे सासू सासरे असे चौघे जण पराशरवर एका मुक्कामासाठी आले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा मी उठून बाहेर आलो तेव्हा आराधना, भल्या पहाटे आवरून , छान साडी घालून, वडाच्या पारावर, ओडिसी नृत्य करत होती आणि तिचा नवरा विश्वा, तिचे शूटिंग करत होता. आराधनाच्या नृत्यविष्कारासोबतची माझी ती पहिली ओळख.  त्यांना लवकर घरी परतायचे होते म्हणुन जास्त गप्पा मारता आल्या नाहीत पण ते दोघं पुण्यात राहतात, नुकतंच लग्न झालंय, आई वडील ओरिसाहून आले आहेत म्हणुन त्यांना ग्रामीण महाराष्ट्र दाखवायचा होता, त्यासाठी आलो होतो...इथपर्यंत कळलं.

आम्ही पुण्यात 5 वर्षांपासून राहतोय आणि महाराष्ट्रियन जेवण म्हणजे पुण्यात मिळतं तेच आणि तसंच असाच काहीसा असणारा त्यांचा समज, पराशरच्या मुक्कामात दूर झाला. इथलं जेवण त्यांना फार आवडलं. तेव्हा मी मोबाइल बदलला होता, माझं पराशर Instagram बंद झालं होतं. आराधनाने 2 मिनिटांत ते सुरू करून दिलं.... ही आमची पहिली भेट.



साधारण 3 महिन्यांनी, ऑक्टोबर महिन्यात, पुन्हा एकदा, विश्वा, आराधना आणि तिचे आई वडील असे चौघेजण एका मुक्कामासाठी पराशर वर आले. आराधनाची आई फार बोलकी होती, उत्साही होती. त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी हौसेने करायची असायची. डांगर भोपळ्याच्या पानांची भाजी खूप छान होते, तसेच अनेक ओडिसी खाद्यपदार्थांमध्ये ही पाने वापरली जातात म्हणुन शक्य होतील तितकी डांगराची पाने त्यांनी जमा केली होती.

आराधनाचे आई वडील दोघंही संस्कृत विषयातील डॉक्टरेट मिळविलेले, दोघंही प्रोफेसर आणि सध्या निवृत्त झालेले. आराधनाच्या आईने स्वतःचा युट्यूब चॅनेल सुरू केला आहे. त्या स्वतःच गाणं लिहितात, कंपोज करतात, स्टुडिओ घेऊन ते रेकॉर्ड करतात आणि युट्यूबवर आपलोड करतात. त्यांना  संत ज्ञानेश्वरांचे काही अभंग माहीत होते, आम्ही जेव्हा ज्ञानेश्वर रेडा समाधी मंदिराकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी खूप छान अभंग गायले होते. त्यांची पराशर वारी खूप आठवणीत राहील अशी होती. तर ही आमची दुसरी भेट.

आम्ही संपर्कात होतो. विश्वा आणि आराधना कुठे ट्रेक ला जावून आले की फोटोज पाठवायचे. आम्ही instragram एकमेकांना फॉलो करत होतो, त्यामुळे सगळे अपडेट रेग्युलर मिळायचे. त्यांना रुद्रा चं लळा लागला होता. दिवाळीत जेव्हा रुद्रा आजारी पडला होता तेव्हा विश्वा, आराधना आणि त्यांचे आईवडील अशी सर्वांनीच चौकशी केली होती. आराधना चे,  नृत्याराधना नावाचे Instagram अकाऊंट आहे, तिथं ती वेगवेगळे डान्स फॉर्म्स, योग करतानाचे व्हीडिओज पोस्ट करत असायची. तिची लवचिकता, डान्स करतानाच्या स्टेप्स, तिचं डेडीकेशन बघता माझी उत्सुकता चाळवली. आराधनाच्या नृत्याराधनेविषयी जाणून घ्यावसं वाटलं आणि अर्थात ती सुद्धा तेवढीच मोकळी ढाकळी असल्याने तिच्याशी थोड्या गप्पा मारल्या.



आराधना सध्या पुण्यात आय टी क्षेत्रात नोकरी करते. तिचं इंजिनिअरिंग भुवनेश्वरला झालं, कॉलेज पूर्ण व्हायच्या आधी कॅम्पस इंटरव्हीवच्या माध्यमातून तिला पुण्यात नोकरी मिळाली. ती आणि तीचा नवरा विश्वजित दोघंही ओरीसाचेच. त्यांची 5 वर्षांची मैत्री पुढे प्रेमात आणि मग लग्नात बदलली. आराधनाला एक भाऊ, तो लंडनला असतो. तिच्या आईवडीलांना जगण्याच्या धावपळीत एकच अपत्य पुरेसं होतं. पण आईला नृत्याची असणारी आवड अस्वस्थ करत होती. आपण नृत्याची आराधना करावी, संगीताची पूजा करावी. हे सांस्कृतिक संस्कार पुढच्या पिढीत झिरपायला हवेत, त्यासाठी त्या मनोमन प्रार्थना करायच्या, मला मुलगी होऊदे म्हणजे हे सगळं मी तिला देवू शकेल.

जेव्हा “आराधना” ची चाहूल लागली तेव्हा डॉक्टर म्हणाले होते, हे अपत्य एकतर खेळाडू होईल किवा  डान्सर होईल. एवढ्या लाथा आराधना पोटात असताना मारत होती. मुलगी झाली, आईने नाव ठेवले, “आराधना”. तिचं नृत्याचं ट्रेनिंग सुरू झालं. तिने आयुष्यात पहिली चप्पल घालण्याआधी पायात घुंगरू बांधले होते.  वयाच्या 3 ऱ्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता.  



वाढत्या वयासोबत ती नृत्याचे धडे गिरवू लागली. ती प्रशिक्षित ओडिसी नृत्यांगना बनली. भरतनाट्यम नंतर सर्वात जुना नृत्य प्रकार म्हणुन तिला ओडिसी नृत्य फार जवळचे आहे. पुढे 10-12 वीच्या  व्यापात डान्स प्रॅक्टिस सुटली, त्यामुळे व्यायाम थांबला, आजारपण वाढलं... तशातच कॉलेज पूर्ण झालं, पुढं नोकरी लागली.

कोरोनाकाळात बराच काळ एकटीला रहायला मिळालं तेव्हा तिने योग सुरू केला. योग आणि नृत्य यात बरच साम्य असल्यासारखं तिला जाणवलं. मधल्या काळात तिची आध्यात्मिक बैठक पण जमून आली होती. या सर्वाचा परिपाक असा झाला की ती, आदियोगी शिव, योग आणि नृत्य या तिघांच्या फ्यूजन मधून तिने काही डान्स फॉर्म्स डिझाईन करायला घेतले. त्या फ्यूजनचे अनेक व्हिडीओज ती नृत्याराधना युट्यूब चॅनल वर पोस्ट करत असतेच.



भीमाशंकरच्या अनुषंगाने आणि शिवाच्या अंगाने, नृत्याच्या माध्यमातून काही करता येईल का याची चाचपणी आम्ही करून पाहिली, पण गोष्टी जुळून आल्या नाहीत. एकदा असंच बोलताना मी तिला म्हणालो की एखादी डान्स थीम घेऊन तू पराशरवर शूट का करत नाहीस? माझ्या डोक्यात आहे ते, करूया लवकरच तिने आश्वासक उत्तर दिले. मे महिन्यात तिने आपण पराशरवर शूट करूया असं सांगितलं. आम्ही सगळी तयारी केली. तिने सांगितलेल्या गोष्टी अरेंज करून ठेवल्या. शूटचा दिवस अवघा 3 दिवसांवर आला असताना, आराधनाचा मेसेज आला, प्रॅक्टिस करत असताना, पाय लचकला, पुढील 3 महीने डान्स करता येणार नाही असं डॉक्टर म्हणाले.

पण हार मानेल ती आराधना कसली. जशी पायाची दुखापत जरा बरी झाली, तिने पुनः प्रॅक्टिस सुरू केली. मध्यंतरी काशी विश्वेश्वराला जावून आली. या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने तिने एकूण 6 डान्स फॉर्म्सचे फ्यूजन करून एक थीम बनवली, “भारत“ नावाची. त्याच्या शूटिंग साठी तिने 9 ऑगस्ट ही तारीख फायनल केली. पायाची दुखापत जवळपास बरी झालीय, मी आता परफॉर्म करू शकते, तेव्हा आपण आता प्लॅनिंग करूच, तिचा मेसेज आला. आमची तयारी झालेलीच होती.



9 ऑगस्ट ला आराधना, विश्वा आणि तिची टीम रात्री 8 वाजता पोहोचले. टीम, शूटिंगच्या तयारीला लागली. आराधना ड्रेसिंग व मेकअप साठी गेली. नम्रताने तिला साडी नेसवायला थोडी मदत केली. ती स्वतःच सगळं करत होती. सगळं म्हणजे अगदी सगळंच. मग व्हिडिओची भारत थीम, त्यातील डान्स फॉर्म्स, लोकेशन्स, ड्रेसिंग हे सगळं आराधना बघत होती. तिला खण्यापिण्याचे भान नव्हते. लाइट्स अरेंज झाल्या, सगळी तयारी झाली. रात्री साडे नऊ ला शूटिंग सुरू झालं, 2-3 मिनिटांच्या फायनल टेक साठी जवळपास 3 तास शूटिंग चाललं.

माझी 7 वर्षांची मुलगी, अहिल्या ते सर्व लक्षपूर्वक बघत होती. सुरवातीला रुद्रा पण तिथेच होता. एक टेक झाला की रुद्रा टाळ्या वाजवून वाव म्हणायचा. आराधना एखाद्या टेक नंतर थांबली की अहिल्या तिला पाणी द्यायची, मला पण या दिदी सारखा डान्स करायचा आहे, अहिल्याला आराधना कडून प्रेरणा मिळत होती. मी अहिल्याला काहीही न बोलता तिच्या विश्वात मोकळे सोडले.



रात्री 12 वाजता शूटिंग संपले, तू जेवणार ना आता, मी आराधना ला विचारले, अजिबात नाही. मला लवकर उठायचं आहे, उद्याची तयारी आहे परत. मी लवकर झोपते म्हणत आराधना न जेवताच झोपायला गेली. ही पोरगी तहान भूक विसरली होती. तिचं डेडीकेशन आणि कमिटमेंट जबरदस्त होती.

दुसऱ्या दिवशी पहाटेच आवरून , 7 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत, पराशरमधील तसेच परिसरातील अनेक ठिकाणी वेगवगेळे डान्स फॉर्म्स निवडून शूटिंग झाले. आणि विशेष म्हणजे तिच्या ऑफिसची ऑनलाइन मीटिंग अटेंड करून तिने हे सर्व जमवून आणले.

आराधना कलाकार जरी असली तरी व्यवहारात जगते. आपल्या नृत्याकडे ती  कलेच्या, उपासनेच्या नजरेतून बघत असताना, कुठंतरी जुन्या नव्याचा संगम करून, आपल्या कलेचे जतन करावे असे तिचे स्वप्न आहे.  म्हणुन ती अशा वेगवेगळ्या थीम घेऊन डान्स परफॉर्म करते. त्यासाठी थीम, लोकेशन, टीम, लागणारा वेळ, साहित्य, सामग्री, ड्रेपरी आणि बजेट हे सगळं अरेंज करते आणि हे सगळं आपली नोकरी सांभाळत करते हे विशेष.



आराधनाच्या या नृत्याराधनेत विश्वा, एक समिधा बनून पडत असतो. कधी असिस्टंट, तर कधी मेकअप मॅन, कधी साऊंड ट्रॅक प्लेयर तर कधी सारथी अशा वेगवेगळ्या भूमिका, तितक्याच शांततेने विश्वा निभावत असतो, तिला खंबीर साथ देत असतो.

या स्वातंत्र्य दिनी, आराधना मुळे, आपल्या पराशर कृषि व संस्कृती पर्यटन केंद्राला एक अनोखी भेट मिळत आहे. तिच्या विविध डान्स फॉर्म्स च्या माध्यमातून भारतमातेला दिलेली ही मानवंदनाhttps://youtu.be/yqJAYRXn__Y?si=B34ynEsR_mTPZrgW

इथे पहायला मिळेल. तिच्या परफॉर्मन्स मुळे जी काही सकारात्मक ऊर्जा पराशरच्या परिसरात आलीय, ती पुढील काळात येणाऱ्या पाहुण्यांना जाणवत राहील.

भारत चिरायू होवो, भारतीय कला चिरायू होवो, आराधना सारख्या प्रेरणादायी लोकांनी पराशरवर येत राहो आणि आम्हाला प्रेरणा देत राहो. 

जयहिंद जय महाराष्ट्र.     

मनोज हाडवळे

9970515438

     

 

  

 

Saturday 12 August 2023

माणुस- कायम अंतर्बाह्य प्रवासी

माणुस- कायम अंतर्बाह्य प्रवासी  



फिरणं हा माणसाचा स्थायीभाव आहे. मानवाची उत्क्रांती होत असताना, आपल्यासारख्याच इतर जातीच्या मानवाला नष्ट करून जेव्हा होमो सेपियन एकटाच उरला; तेव्हा दुसऱ्यावर कुरघोडी करणं हा त्याचा स्थायीभाव स्वतःच्याच मुळावर उठू लागला. सुरुवातीला एकट्याने राहणारा नंतर समूहात राहू लागला. त्याच्या बुद्धीचा विकास अफाट वेगाने होत असताना, त्याने समूहाचे काही कायदे कानून बनवायला सुरुवात केली. काळासोबत हे नियम कधी धर्माचं, कधी जातीचं रूप घेऊन समूहाला प्रभावित करण्यात; आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, श्रेष्ठ आहोत, ही अहंपणाची भावना विकसित करण्यात खतपाणी घालू लागले. 


आतापर्यंतच्या, मानवाच्या प्रवासात त्याच्या बुद्धीचा उपयोग हा त्याचं जगणं सुकर करण्यासाठी होत राहिला आहे. मग त्यामध्ये भौतिक सुविधांची निर्मिती, जगण्यातील मेहनत कमी करण्याचे वृत्ती, शारीरिक कष्टांना कमी करण्यासाठी माणसाने त्याची बुद्धी पणाला लावली. अगदी अलीकडच्या काळातील रोबोट संकल्पना आणि त्यानंतरची कृत्रिम बुद्धिमत्ता अशा गोष्टींना घेऊन माणूस विचार करू लागला. माणूस हा इतर सजीवांपेक्षा त्याच्या विचार करण्याच्या व लक्षात ठेवण्याच्या गुणांमुळे वेगळा ठरतो आणि म्हणूनच त्याचं हे वेगळेपण शारीरिक कुवत नसतानाही या पृथ्वीवर अधिराज्य गाजवण्यासाठी पुरेसं ठरतं.




बुद्धी ही दुधारी तलवार आहे या बुद्धीच्या जोरावर जेव्हा भौतिक सुविधांचा विकास करत असताना, जगणं सुसह्य होत असताना, बुद्धीला खाद्य म्हणून काय द्यावं म्हणून माणसाने स्वतःच जगणंच पणाला लावलेलं दिसतं. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपण माणूस म्हणून जो विचार करतो तशाच प्रकारे विचार करणारी एक वेगळी यंत्रणा माणूस विकसित करून पाहत असताना; त्यातील भविष्यात होणारे परिणाम वाईट असतील असं माझं मत नाही पण ते प्रकृतीच्या नैसर्गिक विकास प्रक्रियेला आणि पर्यायाने मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रवाहाला छेद देणारे नक्कीच असू शकतील. कदाचित मानवी उत्क्रांतीचा महत्वाचा टप्पा म्हणुन त्याकडे पाहता येईल. 


मानवाने त्याच्या जगण्याला सुसह्य करण्याची मजल याच बुद्धीच्या जोरावर मारली. याच जगण्याला प्रगल्भ करण्याची, बौद्धिक विकासाच्या कसरतीची यंत्रणा, जी या आसुरी वेगाचे का? कशासाठी? कुठपर्यंत? कोणासाठी? किती? हे प्रश्न बुद्धी आणि मन या दोघांना समन्वयित करून स्वतःलाच डोळसपणे विचारू शकेल अशी यंत्रणा याच मानवाने विकसित केली; ज्याला आपण अध्यात्म म्हणू शकतो. आजचा आधुनिक मानव अध्यात्म आणि धर्म यात गल्लत करताना दिसतो. 



अध्यात्माचा मार्ग मनन, चिंतन, स्वतःच्या शोधाकडे घेऊन जातो; तर धर्माचा मार्ग स्वतःच्या शोधापासून परावृत्त करत एका संमोहित दुनियेत जगायला प्रवृत्त करतो. अध्यात्म आपल्याला प्राकृतिक विकासाच्या नैसर्गिक वेगांसोबत टिकवून ठेवते तर धर्माच्या माध्यमातून इतरांपेक्षा आपल्याला वेगळे ठरवणारी मानसिकता विकसित होते, की ज्याचा दुरगामी परिणाम हा मनशांती पेक्षा मनाच्या उत्कटेकडे घेऊन जात असतो. 

मनशांती आणि मनाची उत्कटता हे दोन्ही स्वभाव एकाच मनाशी खेळ करत असतात. सध्या 5-G चा जमाना आहे. ग्रामीण भागातील एखाद्या खेड्यातील घरात बसून, कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता आपण युट्युबवर; पाहिजे ते बघू शकतो. हा झाला मानवाच्या बुद्धीच्या जोरावर झालेला भौतिक विकास. पण याच युट्युबवर आपल्या आवडीचं काहीतरी बघत असताना, जो काही थोडासा बफरिंग अडथळा येतो; तेवढ्या काळात पेशंस न राहता चिडचिड होणं आणि युट्युबला काहीतरी बघितल्यानंतर आदळआपट होणं,  मनाची शांती हरवून मन चंचल व उत्कट होणं, हा झाला मानवाच्या बौद्धिक विकासातून साधला गेलेला, जगण्याच्या गुणवत्तेचा परिणाम.


माणूस जन्माला येतो गर्भातून, तो त्याचा केंद्रबिंदू असतो. माणूस वयाने व  शरीराने वाढत जातो, ज्याला आपण भूमितीच्या भाषेत त्रिज्या म्हणू शकतो. जसं प्रत्येक ग्रह एका विशिष्ट ऊर्जेने स्वतःभोवती फिरत असताना, दुसऱ्या भोवतीही फिरतो. अगदी त्याचप्रमाणे जन्माला आलेला माणूस त्याच्या आत्मरुपी उर्जेने स्वतःभोवती जगणं गुंफत असताना, जगाचंही आकलन करत, जगातही तो फिरत असतो. त्याची फिरण्याची कक्षा वाढत्या वयासोबत वृंदावत जाते. सवयीने त्याचं फिरणं त्या परिघावर असतं, त्याच्या कक्षेत अनेक विचारधारा, अनेक लोक, अनेक प्रलोभनं, अनेक आव्हानं, प्रेम, लोभ, राग, मत्सर, इर्षा अशी अनेक भावनिक आंदोलनं ही सर्व त्याच्या परिघावर त्याला भेटत असतात. 

त्या कक्षेवर फिरत असताना, त्याला जसं आनंदी करतात तसं कधी विचलितही करतात. जगण्याच्या आनंदासोबत विरक्ती आणतात पण मानवाला त्याच्या केंद्रबिंदूकडे म्हणजेच स्वतःकडे परतण्याचा चिंतनुरूपी एक मार्ग नेहमीच मोकळा असतो ज्याला आपण अध्यात्म म्हणतो. माणूस विचार करू शकतो आणि त्याच बळावर तो जगरहाटीच्या परिघावरून पुन्हा भौमितिक सिद्धांतांना छेद देत, स्वतःच्या केंद्रबिंदूकडे प्रवास करू शकतो. अशावेळी जगरहाटीच्या परिघावरची गती सोडून, तो स्वतःच्या गतीने केंद्राकडे त्रयस्थपणे बघू शकतो, केंद्राजवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतो, ही सुद्धा ताकद माणसाला त्याच्या बौद्धिक विकासाने दिलेली आहे.



दुर्दैव असं की या अंतर्गतशक्तीचा त्याला अंदाज येत नाही; कारण बाह्य जगातील प्रलोभनं, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या सर्वांचा हव्यास त्याला परिघावरच फिरण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. अनादी कालापासून या सृष्टीचा विकास होत असताना आपण आपल्या 60-70 वर्षाच्या आयुष्यात या पृथ्वीवर येतो. आजमीतिला आपल्यासारखीच सुमारे 750 कोटी लोक या पृथ्वीतलावर राहत आहेत. आपण खूप प्रतिष्ठित आहोत, आपल्याला खूप लोक ओळखतात ह्या भ्रमात आपण आपल्या जगण्याचं एक छोटसं विश्व, ह्या विराट विश्वामध्ये तयार करून घेतो. कारण या विराट विश्वाला भिडण्याची हिंमत आपल्यात कधीच नसते. खरंतर आपण या विराट विश्वाच्या एका अणूपेक्षाही छोटा भाग आहोत. पण हे कळण्यासाठीची मनाची मशागत होण्यात अनेक अडथळे येत असतात. 

जर कधी कोणी आपल्याला आपली ओळख विचारली तर पटकन आपण आपलं नाव, गाव, हुद्दा, अमुक व्यक्तीचा नातेवाईक अशा गोष्टींचे रेफरन्स विचारणाऱ्याच्या अंगाने देत असतो. ही ओळख सांगत असताना एकमेकाच्या परिचयाची भावना असेल तर सांगत असताना काही ऐकलं पण जातं. परिचयाचा टप्पा पार केल्यानंतर जेव्हा नव्याने भेटलेल्या दोन व्यक्ती एकमेकाला जोखायला लागतात तेव्हा तात्पुरते अहंगंड शांत केले जातात. मग कोण किती पोहोचलेला आहे, कोण किती बडा असामी आहे त्यानुसार त्याच्याशी वर्तन ठरले जाते. कोण किती उपयोगी आहे त्यानुसार भविष्यातील भेटीगाठी ठरत असतात, कारण या भौतिक जगात मानवाला दोन प्रकारची मूल्य; उपयोगीता आणि उपद्रव मूल्य असली तरच तो या जगरहाटीच्या कामाचा ठरतो. यातील दोन्हीही मूल्य जर नसतील तर तो जगाच्या काही कामाचा ठरत नाही. 



या जगात प्रसिद्ध नसलेली अशी अनेक लोक आहेत की ज्यांना खरं तर कोणीच काही जबाबदारी दिलेली नसली, तरी कुठलाही हर्क्युलस चा भाव मनात न आणता; आपापल्या क्षेत्रात ही लोक स्वतःच्या उर्जेला, विचाराला आणि कृतीला न्याय देत; जगण्याचं जे माध्यम निवडलेलं  आहे, त्यात छान प्रकारे जगत असतात. मग कोणी छान शोध लावतो, कोणी छान शेती करतो, कोणी छान शिकवतो, कोणी छान घर बांधतो, कोणी छान चित्र काढतो, कथा लिहितो, सिनेमे बनवतो हे सर्व करत असताना ती व्यक्ती खरंतर स्वतःसाठी करत असते, स्वतःच्या क्षमतांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. 

त्या व्यक्तीच्या त्या कृतीने जगाला जे काही मिळतं ते खरंतर त्याच्यासाठीचं बायप्रॉडक्ट आहे. पण आजच्या या हायस्पीडच्या काळात जसं जगण्याच्या मुख्य केंद्रबिंदूकडे जाण्याऐवजी, जगराहाटीच्या परिघावर फिरण्यात धन्यता मानली जाते; तसंच मुख्य प्रॉडक्टकडे दुर्लक्ष करून बायप्रॉडक्टलाच सिरियसली घेण्याची वृत्ती बळावली आहे. आणि त्यामुळे सर्व सुखसोयी, भौतिक सुविधा पायाशी लोळण घेत असतानाही माणूस दुःखी असतो, चंचल असतो, मनशांती हरवलेल्या अवस्थेत सुख शांतीसाठी चाचपडत असतो. 


मानवाचं हे चाचपडणं आजच्या एका मोठ्या उद्योग व  व्यापाराचे भांडवल आहे. याच भांडवलाचा उपयोग करून धर्मगुरू, आध्यात्मिक गुरु, बिजनेस कोच, मेंटॉर अशी एक मोठी फळी तुम्हाला सेवा पुरवायला जगभरात उभी राहिलेली आहे. इथं खरं गंमत आहे.  सगळी माणसं सारखी, सारख्याच मेंदूची पण केवळ विचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे आणि आपल्या विचारक्षमतांची जाण नसल्यामुळे संमोहित अवस्थेत जगत असतात. यातील काही जागरूक मेंदू या संमोहित मनांचा ताबा घेऊन त्याच्यावर आधीराज्य गाजवू पाहतात. तात्पुरते उपाय योजले जातात की ज्यांना आपण बिझनेस सेमिनार, मनशांतीचे सेमिनार अशा अनेक नावाने ओळखू शकतो. 

मला वाटतं ही सगळी फांद्यांवरची उपचार पद्धती आहे; जर आपल्याला रोग समूळ नष्ट करायचा असेल तर जी काही उपाययोजना करायची आहे ती मुळांवर व्हायला हवी, जी आपोआप फांद्यांवर फरक दाखवेल. आपल्याही जगण्यात जर आपल्याला सकारात्मक गोष्टींची गरज वाटत असेल, तर वरवरची उपायोजना तात्पुरता परिणाम देत जरी असली तरी शाश्वत बदलासाठी आंतरिक मनावर, आत्म्यावर उपचार होणे गरजेचे आहे. आणि ह्या उपचार पद्धतीचा एकमेव नाव आहे अध्यात्म. 


अध्यात्म हे कुठल्याही विचारधारेची, धर्माची, देशाची, पंथाची व लोकांची मालकी नाही; अध्यात्म हे सचेतन मनाचं प्रतिबिंब आहे, जे प्रत्येकात असतच असतं. आपल्याला ते फक्त जागं करावं लागतं. अर्थात हे इतकं सोपं वाटत असलं तरी तितकं ही सहज नाही, कारण आपण अनेक गोष्टींनी आकर्षित असताना, प्रभावित असताना त्या जगण्याचा आणि आंतरिक जगण्याचा समतोल साधणं ही एक कला होऊन बसते. ज्याला ही कला साधता आली त्याचं जगणं समतोल झालं. 

माणूस जन्माला आल्यापासून शेवटचा श्वास घेईपर्यंत जो काही प्रवास करतो, तो प्रवास स्वतःच्या शोधाचा असतो. स्वतःचा शोध हा स्वतःच घ्यायचा असतो, त्याच्यासाठी भलेही कुठली यंत्रणा तुम्हाला एका पातळीपर्यंत मदत करू शकेल; पण त्या पुढचा प्रवास मात्र स्वतःचाच असतो. कधी कधी कोणाला स्वतःचा शोध लागतो तर कधी शोध घेण्याच्या प्रवासात जगण्याचा प्रवास संपतो; या सर्व प्रक्रियेत माणूस म्हणून आपण एक गोष्ट निश्चितपणे करू शकतो ती म्हणजे अंतर बाह्य प्रवास.
एक प्रवासी-मनोज हाडवळे
9970515438 
पराशर कृषि व संस्कृती पर्यटन